गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो. ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत... See more
गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो. ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते. गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात. - अविनाश सप्रे